शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अखेर जाहीरपणे कबूल केलं; म्हणाले 'होय आम्ही खोकेवालेच..'
Gulabrao Patil :बाळासाहेबांची शिवसेनापक्षाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेत कबूल केले आहे की,'होय,आम्ही खोकेवाले'आहोत.
जळगाव – शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहोचले होते. शिंदे यांच्यासोबत ज्या ५० आमदारांनी बंडखोरी केली होती त्यामुळे गुलाबराव पाटीलही सामील होती. बंडखोरीपासून या ५० आमदारांचा एक शब्द पिच्छा सोडत नव्हता तो म्हणजे खोके व खोके सरकार. विधीमंडळाच्या अधिवेशनातही विरोधांनी ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करून या नारा महाराष्ट्रभर पोहोचवला. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी तर गद्दार व खोके शब्दावरून राज्यभर रान उठवले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मात्र, आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेत कबूल केले आहे की, 'होय, आम्ही खोकेवाले' आहोत. त्यामुळे मतदारसंघासाठी ३७० खोके आणले आहेत. जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मतदारसंघात कोट्यवधींची कामं झाली आहेत. याला म्हणतात काम. होय आम्ही खोके वाले. मुख्यमंत्र्यांनी आज ३७० खोके आम्हाला मतदार संघासाठी दिले आहेत. या निधीतून बांधलेला पुल राष्ट्रवादीवाले वापरणार नाहीत का? पाणी ते पिणार नाही का? असा सवाल त्यांनी केली. महाआघाडी सरकारवर आरोप करताना गुलाबराव म्हणाले की, मी मंत्री असताना मला चिमणराव आबा इतका निधी दिला नाही. विरोधकांनी काम पाहून बोलावं. मी बोलणार नव्हतो. पण शिंदे साहेबांनी आदेश दिला बोल. मंत्री राहायच आहे म्हणून बोललो.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत व शिवसेनेच्या भवितव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल शुक्रवारी होणार आहे.