Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विशेष विमानाची सोय, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Manipur violence : मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५४ हून अधिक लोकांचा बळी गेला आहे तर १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल व भारतीय लष्कराचे सुमारे १० हजार जवान राज्यातील रस्त्या-रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. हिंसाचारादरम्यान, मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने यंत्रणा अलर्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आहे.
या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लवकरच विशेष विमान मणिपूरला पाठवण्यात येणार आहे, तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. महाराष्ट्राचे अनेक तरुण मणिपूरच्या एनआयटी आणि आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील काही विद्यार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वासन दिले. तसेच, मणिपूरमधील परस्थितीवर महाराष्ट्र सरकार लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील किती विद्यार्थी मणिपूरमध्ये आहेत, याचा निश्चित आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. आयआयटी आणि एनआयटीमध्ये शिक्षण घेणारे अनेक राज्यातील विद्यार्थी तेथे अडकून पडलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपआपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपुरातील परिस्थिती विद्यार्थ्यांकडून समजावून घेत त्यांना मदतीचं आश्वासन दिलंय.
यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.