Koshyari: राज्यात वातावरण तापलं असताना कोश्यारींचं अमित शाहांना पत्र, म्हणाले, तुम्हीच काय ते सांगा!
Bhagat Singh Koshyari writes to Amit shah: महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अडचणीत आलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
Bhagat Singh Koshyari writes to Amit shah: छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांबद्दल राज्यपालांनी वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं आहे. सध्याच्या परिस्थितीतून तुम्हीच मार्ग काढा, अशी विनंती कोश्यारी यांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अन्य नेत्यांनी राज्यातील महापुरुषांबद्दल वारंवार केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळं जनमाणसामध्ये रोष आहे. विशेषत: राज्यपालांकडून अशी वक्तव्यं पुन्हापुन्हा झाल्यानं त्यांना त्यांची राज्यातून उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. ठिकठिकाणी राज्यपालांचा व भाजपचा निषेध होत आहे. जिल्ह्याजिल्ह्यात बंद पुकारण्यात येत आहेत. याच मागणीसाठी मंगळवारी पुणे बंद पुकारण्यात आला आहे व १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी अमित शहा यांची मदत मागितली आहे.
राज्यपालांच्या पत्रात काय म्हणतात?
एका विद्यापीठात मी केलेल्या भाषणावरून सध्या गदारोळ सुरू आहे. माझ्या संपूर्ण भाषणातील एक वाक्य वेगळं काढून त्याचं भांडवल केलं जात आहे. आम्ही शाळेत असताना महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आमच्यापुढं आदर्श असतं. सध्याच्या काळात नितीन गडकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असू शकतात, एवढंच मी म्हणालो होतो. म्हणजेच, आजची तरुण पिढी डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा यांचा सुद्धा आदर्श घेऊ शकते. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर असू शकतो, असं मला म्हणायचं होतो. यात महापुरुषांशी तुलना करण्याचा प्रश्नच नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराज हे तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळात जेव्हा मोठमोठे लोक घराबाहेर पडत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतलं. शिवरायांसारख्या वीराला जन्म देणार्या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा इथंही जाऊन आलो. मागच्य ३० वर्षांत त्या ठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळ प्रेरणास्त्रोत आहेत, असाच माझ्या बोलण्याचा मतितार्थ होता.
खरंतर, २०१९ पासून कोणतीही निवडणूक न लढण्याची आणि राजकीय पदांपासून दूर राहण्याची इच्छा मी प्रदर्शित केली होती. परंतु माननीय पंतप्रधान आणि आपण टाकलेल्या विश्वासामुळं मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचं राज्यपालपद स्वीकारलं. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर लगेच खेद व्यक्त करणं किंवा क्षमायाचना करण्यास मी मागंपुढं पाहत नाही.
साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत काय करायचं त्यावर तुम्हीच मार्गदर्शन करा.