Chhagan Bhujbal: सरकारनं किती डास पकडले? नर किती, मादी किती?; भुजबळांची तुफान फटकेबाजी
Maharashtra Assembly Monsoon Session: पालघर जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नावर सरकारनं दिलेल्या उत्तरावरून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्र्यांना चांगलंच कोंडीत पकडलं.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य समस्यांच्या प्रश्नावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आरोग्यमंत्री निरुत्तर झाले होते. नव्या सरकारला आपला पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवावा लागला होता. त्यानंतर आज एका लेखी उत्तरावरून पुन्हा आरोग्यमंत्र्यांची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.
पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रभाव वाढत असून सरकारनं यावर काय उपाययोजना केली, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तर देण्यात आलं होतं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हेच उत्तर आज सभागृहात वाचून दाखवलं. 'सरकारनं निवडक भागातील डास पकडून त्याचं वर्गीकरण केलं, विच्छेदन केलं व डास घनता काढली, असं ते म्हणाले.
सावंत यांच्या या उत्तरावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. 'सरकारनं एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले, यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हिसेरा उपलब्ध आहे का? असे प्रश्न भुजबळ यांनी केले. भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना योग्य उत्तर देता आलं नाही. ते काही क्षण गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.