कोल्हापूरचा विषयच हार्ड.. पठ्ठ्या ५१ टक्क्यांनी झाला पास; मित्रांनी काढली उंटावरून वरात, कारणही आहे खास, VIDEO
Kolhapurnews : समर्थ पास झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. समर्थची गुलालाने उधळण करत चक्क उंटावरून मिरवणूक काढली.
Kolhapur News : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असते. दहावीतील यशावरच पुढील शिक्षणाची व करिअरची दिशा ठरत असते. आज ( २ जून) दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून राज्याचा निकाल ९३.८० टक्के लागला आहे.लातूर पॅटर्नचा राज्यात पुन्हा एकदा बोलबाला दिसून आला असून लातूर विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. आयुष्याच्या भवितव्याचा पाया रचणाऱ्या दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही असते. तसेच ती मित्रमंडळींनाही असते. आपल्या पाल्याला किती गुण मिळतील हे पालक सांगू शकणार नाहीत, मात्र त्याचा मित्र परिवार अचूकपणे सांगू शकतो की, तो किती पाण्यात आहे.
त्यामुळे मित्र परिवारात एखादा चांगल्या गुणांनी पास होत असेल तर त्याची चर्चा होतेच,पण एखादा काठावरील असेल, तर त्याचीही चर्चा होत असते. अर्थात गुण हेच अंतिम साध्य नाही हेसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे.
दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. समर्थ सागर जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला व त्याच्या पालकांना जशी दहावीच्या निकालाची उत्सुकता होती, तशीच ती त्याच्या मित्रपरिवारालाही होती. त्याची अभ्यासातील प्रगती पाहून मित्र त्याला तू नापासच होणार अशी हेटाळणी करत होते. मात्र आजच्या निकालाने समर्थ दहावीत यश मिळवून आपण पुढच्या शिक्षणासाठी समर्थ असल्याचे सिद्ध केलं. समर्थ ५१ टक्के गुण मिळवून पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले.
पास होताच गुलालाची उधळण करत उंटावरून मिरवणूक -
समर्थ पास झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. समर्थची गुलालाने उधळण करत चक्क उंटावरून मिरवणूक काढली. त्यामुळे ९५ ते १०० टक्के मार्क मिळवलेले विद्यार्थीही उंटावर बसलेल्या भावड्याकडे पाहतच राहिले. त्याची कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात मित्रांनी त्याची उंटावरून मिरवणूक काढत जंगी सेलिब्रेशन केले. समर्थ कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमधील विद्यार्थी आहे. मित्रांनी पास होणार नाहीस असे वर्षभर चिडवले, मात्र पास होताच मित्रांनीच उंटावरून मिरवणूक त्याचा ५१ नंबरी निकाल संस्मरणीय करून टाकला. त्यामुळे कोल्हापूरचा नादच खुळा, याची प्रचिती पुन्हा आली.
विभाग