राणा दाम्पत्यांना न्याय देण्यासाठी किरीट सोमय्यांची पुन्हा दिल्ली वारी
राज्य सरकारने त्यांच्या सोबत योग्य केले नाही. या प्रकरणी त्यांना न्याय मिळावा यासाठी किरीट सोमय्या हे भाजप श्रेष्ठींकडे याबाबत तक्रार करणार आहेत
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याच्या मुद्यावरून जवळपास आठवडाभर राणा दाम्पत्य हे तुरुंगात होते. त्यांची काल जामिनावर मुक्तता झाली. दरम्यान, त्यांना चांगली वागणूक न मिळाल्याचा राग राणा दांम्पत्याने आवळला आहे. गुरुवारी नवनीत राणा यांनी त्यांना तुरुंगात मिळालेल्या वागणूकीची आपबिती कथन केली. राज्य सरकारने त्यांच्या सोबत योग्य केले नाही. या प्रकरणी त्यांना न्याय मिळावा यासाठी किरीट सोमय्या हे भाजप श्रेष्ठींकडे याबाबत तक्रार करुन या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी ते करणार आहे. या बद्दल त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरला होता. त्यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाचे प्रयत्नही केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांची रवानगी ही तुरुंगात करण्यात आली होती. गेल्या आठवड्याभरापासून जामिन मिळवण्यासाठी दोघेही झटत होते. पण, कधी न्यायालयाला कामकाज जास्त असल्याने तर कधी सुनावली लांबल्याने त्यांच्या जामिनाला विलंब झाला. राज्य सरकारने मात्र, त्यांच्या जामिनाला विरोध केला. राणा दांम्पत्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे असल्याने ते बाहेर आल्यास सामाजिक शांततेला भंग पोहचू शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. मात्र, गुरूवारी राणा दांम्पत्याचा जामीन न्यायालयाने मंजुर करत त्यांना दिलासा दिला. बाहेर आल्यावर त्यांनी आपल्याला कारागृहात योग्य न्याय मिळाला नसल्याचे सांगत सरकारवर आरोप केले होते. मात्र, पोलिसांनीही थेट चांगल्या वागणूकीचे पुरावे सादर केले होते.
नवनीत राणा याना कारागृहात असताना स्पाँडिलायसिची व्याधी बळावली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी कारागृहात मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल दाम्पत्याने आपले कारागृहातले अनुभव किरीट सोमय्यांना सांगितले. त्यांचे अनुभव ऐकून आपण इंग्रजांच्या काळात आहोत का अशी टीका पण त्यांनी केली होती.
राज्य सरकार हे सुडबुद्धीने वागत असून राणा दाम्पत्यावर अन्याय झाला आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी किरीट सोमय्या आता दिल्ली दरबारी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजते. त्यांना या प्रकरणी न्याय मिळावा तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या करणार आहेत.