Border Dispute : कर्नाटकच्या गुळावर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
maharashtra karnataka border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसह जत तालुक्यावर दावा ठोकला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटलं आहे.
maharashtra karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट आणि सांगलीतील जत तालुक्यावर दावा ठोकला आहे. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्वीटर वार झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर आता सीमावाद आणखी पेटत असतानाच कर्नाटकातून येणाऱ्या गुळावर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. त्यामुळं आता यावरून आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकच्या गुळावर बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरातील मार्केट यार्डमध्ये कर्नाटकातील गूळ विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. याशिवाय ज्या व्यापाऱ्यांकडे कर्नाटकात तयार झालेला गूळ आढळला तर त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणि गुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोट आणि जत तालुक्यावर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगाव, निपाणी आणि कारावारला महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.