INS Vikrant Fund Scam : किरीट सोमय्यांना क्लीन चिट मिळताच संजय राऊत म्हणाले, सरकार बदललं की…
Sanjay Raut on Kirit Somaiya Clean Chit : आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut on Kirit Somaiya: आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे गोळा करून ते हडपल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘विक्रांत प्रकरणात घोटाळा झालेलाच आहे. मग तो एका रुपयाचा असो की ५० कोटींचा. पैशाचा अपहार झाला आहे या आरोपावर आम्ही ठाम आहोत. विक्रांतच्या नावावर जमा केलेले पैसे राजभवनला पाठवल्याचं भाजपवाले सांगतात, पण पैसे आलेच नाहीत असं राजभवन सांगतं. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकतो? पैसे राजभवनला मिळाले नाहीत तर मग ते गेले कुठे?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला.
पैशांचं काय झालं हे स्पष्ट नसतानाही सोमय्यांना क्लीन चिट मिळाली आहे, याकडं पत्रकारांनी लक्ष वेधलं असता राऊत म्हणाले, ‘हे कसं झाले ते गृहमंत्र्यांना विचारायला हवं. खरंतर हा ईडीच्या अखत्यारीतील विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी झालेला हा खेळखंडोबा आहे. आज क्लीन चिट मिळाली याचा अर्थ २०२४ ला हे प्रकरण समोर येणारच नाही असं नाही. सरकार बदलेल आणि सगळ्यांचा हिशेब हा पूर्ण केला जाईल. कोणतंही सरकार कायमस्वरूपी नसतं, असं संजय राऊत यांनी ठणकावलं. ‘या विषयावर मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.
विभाग