Tanaji Sawant : बाळासाहेब, वाजपेयींना जेवढी गर्दी जमवता आली नाही तेवढी मी जमवली; तानाजी सावंत यांचा नवा दावा
Tanaji Sawant : शिंदे गटातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांची अनेकदा कोंडी देखील झाली आहे. आता त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले असून त्यांच्या या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर : शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेकदा केलेल्या वक्तव्यामुळे ते ट्रोलही झाले आहेत. असे असतांनाही त्यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. पंढरपूर येथे झालेल्या एका सभेत त्यांनी स्वत:चीच पाठ थोपाठली असून त्यांच्या या आत्मप्रौढी विधानामुळे अनेक जन त्यांच्यावर टीका देखील करत आहेत. तानाजी सावंत म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली."
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली. त्यांनी स्वत: ची तुलना थेट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांशी केल्याने डॉ. तानाजी सावंत पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहे. याच बरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा रोष देखील आता ते ओढवून घेणार आहे.
पंढरपूर येथे झालेल्या सभेत सावंत म्हणाले, या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होतं, जे पटांगण आपण घेतलं होतं सभेसाठी, ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरलं नव्हतं, अडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं, आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली, असे सावंत या सभेत म्हणाले.
तसेच सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो, असे सांगत जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे दाखवून दिलं असतं, असं सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोलाही लगावला आहे.
विभाग