असंगाशी संग केल्यामुळंच त्यांनी रस्त्यावर आणून सोडलं; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करत सत्तेसाठी बेईमानी करणाऱ्यांना आज त्यांनीच रस्त्यावर आणून सोडल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात अनेक महिने कायदेशीर लढाई झाल्यानंतर आता आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी थेट निवडणूक आयुक्तांवरच गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या सर्व प्रकरणासाठी ठाकरेंनी भाजपसह मोदी-शहांना जबाबदार धरलं आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. असंगाशी संग केल्यामुळं काय होतं, हे आज ठाकरेंना कळालं असेल, ज्यांच्यासोबत ठाकरेंनी युती केली होती, त्यांनीच ठाकरेंना रस्त्यावर आणून सोडल्याचं सांगत फडणवीसांना ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
उपस्थितांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सत्तेची खुर्ची महत्त्वाची वाटली म्हणून त्यांनी विरोधकांसोबत संसार थाटला. त्यासाठी त्यांनी पंचवीस वर्षांच्या युती सोडली. पण काळाचा महिमा असा की असंगाशी संग केल्यामुळं काय होतं हे त्यांना कळालं असेल. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली, परंतु या पक्षांनीच उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणून सोडलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा वारसा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सत्तेची सुरुवात कोल्हापुरातून करुयात, असा संकल्पही फडणवीसांनी केला आहे.
अमित शहांना ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर...
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे तळवे चाटले, अशी जळजळीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यानंतर आज उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरेंनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लोक भांडत राहिलीत तरच मी सत्तेत राहिल, असंच तर आजच्या मोगँबोला (केंद्रीय गृहमंत्री अमित शहा) वाटत आहे. तुम्ही भाजपमध्ये येत असाल तरच तुम्ही हिंदू आहात, नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडलं, असं सध्या भाजप वातावरण तयार करत असल्याचं सांगत ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली आहे.