Mumbai News : आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी; हिंदू जनआक्रोश मोर्चात भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल
Hindu Jan Aakrosh Morcha Mumbai : भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आहे. त्यावेळी भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
Hindu Jan Aakrosh Morcha Mumbai : गोहत्याबंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाविरोधात कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आज मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आहे. यावेळी भाजपच्या अनेक आमदारांसह हिंदुत्ववादी नेत्यांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी होत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाच्या घटना समोर आल्यानंतर त्याविरोधात कठोर कायदा पारित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी जनआक्रोश मोर्चात भाजप आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी सहभाग घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
जनआक्रोश मोर्चात बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये धर्मांतरणासह लव्ह जिहादच्या घटना समोर आलेल्या आहेत. याविरोधात कठोर कायदा करण्यात यावा, यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला असून भारताला हिंदूराष्ट्र घोषित करण्यात यावं, ही आमची मागणी आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं असून त्यांनी आता फक्त एमआयएमसोबत युती करणंच बाकी आहे. ठाकरे हे हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन राजकारण करत असल्याचा आरोपही आमदार लाड यांनी केला.
महाराष्ट्रात हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न होतोय- राणे
गेल्या तीन वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार सुरू असून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून आता संदेश देणं गरजेचं असल्याचं भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत हिंदूंना पलायन करावं लागत असून या सर्व प्रकारांना उत्तर देण्यासाठी आम्ही हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आहे. हिंदूंनी एकत्र येत जनआक्रोश मोर्चा काढणं हे आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.