Pune ZP School : पुणे जिल्हा परिषदेच्या ६५३ शाळा ठरल्या 'ढ'; २० टक्के विद्यार्थ्यांना वाचताही येईना
Pune Zilha Parishad School : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिक्षणाचा पाया समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षणाची परिस्थिती बिकट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तब्बल ६५३ शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिता आणि वाचता येत नसून त्यांना आकडेमोडीचा गंधही नसल्याचे वास्तव आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला विद्येचे माहेरघर समजले जाते. या सोबतच ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी देखील बिरुदावली असणाऱ्या पुणे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा पाया मात्र, ढासळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. निपुण भारत अंतर्गत जिल्ह्यातील साडेतीन हजारहून अधिक शाळात सर्वेक्षण घेण्यात आले. या शाळांत अनेक शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असतांनाही तब्बल ६५३ शाळातील २० टक्याहून कमी विद्यार्थ्यांना लिहिता आणि वाचता येत नसल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नाही तर या मुलांना गणिताची आकडेमोड सुद्धा करता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
काही दिवसांपूर्वी 'निपुण भारत' अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता कार्यक्रम राबविण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची तीन स्तरांत विभागणी करण्यात आली. या उपक्रमाची फलश्रुती तपासण्यासाठी जिल्हा परिषदेने २२ ते २८ फेब्रुवारी कालावधीमध्ये जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार शाळांमध्ये गुणवत्ता सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली. ही मोहीम राबविल्यावर जिल्ह्यात विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारने अपेक्षित होते. मात्र, मुलांची गुणवत्ता सुधारली नाही. १० १० पटसंख्या असणाऱ्या शाळेतील मुलांची देखील शिक्षणाच्या बाबतीत वाईट परिस्थिती असून काही शाळांवर तर शिक्षकच जात नसल्याचे पुढे आले आहे.
प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या एक लाख ४६ हजार ५५८ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ८९९ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. एक हजार २४९ शाळा 'ढ' असून, एक हजार ११४ शाळांच्या गुणवत्तेत साधारण आहे. जिल्ह्यातील एक हजार शाळांची गुणवत्ता चांगली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवता ही ढासळली असल्याचे आढळले आहे, अशा शाळातील केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना रविवारी बोलावण्यात आले असून त्यांना या बाबत माहिती विचारून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, पुनरमूल्यांकण कार्यक्रम देखील राबविला जाणार आहे, असे प्रसाद म्हणाले.
विभाग