Rakhi Sawant: आदिलशी लग्नानंतर राखी सावंतने नावही बदललं; भावाला वाटतेय काळजी! म्हणाला...
Rakhi Sawant Wedding : राखीचा भाऊ राकेश याने आपल्या बहिणीच्या आदिलसोबतच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीच्या नाव बदलण्यावर देखील त्याने आपले मत सांगितले आहे.
Rakhi Sawant Wedding : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. राखीच्या लग्नाला सात महिने झाले असून, तिने लग्नानंतर आपले नाव आणि धर्म बदलल्याचे देखील समोर आले आहे. यावर आता राखी सावंतच्या भावाने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंत हिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राखी आणि आदिल गळ्यात हार घातलेले आणि हातात लग्नाचे प्रमाणपत्र घेतलेले दिसले होते.
अलीकडेच राखीचा भाऊ राकेश याने आपल्या बहिणीच्या आदिलसोबतच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीच्या नाव बदलण्यावर देखील त्याने आपले मत सांगितले आहे. राकेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखी आणि आदिलचे लग्न झाल्याचे मान्य केले आहे. राकेश म्हणाला की, आमच्या संपूर्ण कुटुंबाला या लग्नाची माहिती आहे. आदिल भाईच्या सांगण्यावरून आम्ही इस्लाम धर्मानुसार निकाह देखील केला. राखीच्या बाबतीत या आधी खूप काही घडले आहे, त्यामुळे आम्हाला तिची काळजी वाटते. आमच्या संपूर्ण कुटुंबाला राखीची काळजी वाटत आहे.
आदिलच्या मनात काही शंका असतील तर, त्याने सगळ्यांशी चर्चा करावी. त्याने स्वतःशी आणि आपल्या कुटुंबाशी बसून बोलावे. राखीचे नाव यात उगाच खराब होत आहे. आधी रितेशने देखील राखीचे नाव वापरले होते. राखीचे नाव बदलण्याची बाब तिच्या भावाने स्वीकारलेली नाही. याबाबत मला कोणतीही माहिती नसून, ती पती-पत्नीमधील खाजगीबाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राखी सोबतच्या लग्नावर आदिलच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र लग्नाच्या वृत्ताला त्याने स्पष्ट नकार दिला आहे. आदिल आणि राखी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
राखीचे म्हणणे आहे की, आदिल आणि तिचे लग्न सात महिन्यांपूर्वीच झाले आहे. हे लग्न गुप्त ठेवण्यासाठी आदिलने तिच्यावर दबाव टाकला होता. राखीने असेही सांगितले की, तिने निकाहसोबतच कोर्ट मॅरेजही केले होते, पण ही गोष्ट तिने आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती. तर, आता आदिल तिच्याशी बोलतही नसल्याचे राखी सावंतने म्हटले आहे.