'खोटी आश्वासनं, अभद्र युत्या..', प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर प्राजक्ताने ही पोस्ट केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. काही दिवसांपूर्वी तिची 'रानबाजार' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजमधील बोल्ड सीन्समुळे प्राजक्ताला ट्रोल केले गेले. पण प्राजक्ता ट्रोलर्सकडे फारसे लक्ष देत नाही. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर देखील बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. आता प्राजक्ताने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहाता एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला 'रानबाजार' या सीरिजमधील एक प्रसंग शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मकरंद अनासपुरे बोलताना दिसत आहे की, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.”
आणखी वाचा : 'परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं', आरोह वेलणकरचे ट्वीट चर्चेत
पुढे व्हिडीओमध्ये एक वृत्तनिवेदिका बोलते की, “महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळले. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे.” प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, 'रान बाजार काय मग बघताय ना?' असे कॅप्शन दिले आहे. त्यावर एका यूजरने कमेंट करत 'क्या बात है, एकदम वेळेत टाकला आहे' असे म्हटले आहे.
विभाग