'परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं', आरोह वेलणकरचे ट्वीट चर्चेत
एकनाथ शिंदेंबाबत आरोह वेलणकरने केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चेत आहे.
सोमवारच्या संध्याकाळपासून राज्याच्या राजकारणात फक्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे एकच नाव ऐकायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत विधान परिषद निवडणुकीनंतर थेट सुरत गाठले. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होणार अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' असे ट्वीट केले होते. ते ट्वीट पाहून अभिनेता आरोह वेलणकरने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आरोहने एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्विट करत, 'परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं' असे म्हटले आहे. त्यापाठोपाठ त्याने आणखी दोन ट्वीट केले आहेत.
'संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकार नावाचा लाजिरवाणा कारभार पाहावा' या आशयाचे ट्वीट आरोहने केले होते. त्यानंतर त्याने आणखी एक ट्वीट केले.
या ट्वीटमध्ये त्याने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत, यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. मला असे वाटते महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय. चला पाहू पुढे काय होतय?' या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.