Marathi News 15 August 2022 Live: विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Aug 15, 2022, 05:26 PMIST
Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.
Sachin Sawant on PM Modi Speech: आधी सरसंघचालकांनी राजीनामा द्यायला हवा - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाही संदर्भातील भाषणानंतर प्रथमतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजीनामा दिला पाहिजे. नंतर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील परिवारवादी मंत्र्यांची गच्छंती करायला हवी, असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हाणला आहे.
Rahul Gandhi: घराणेशाहीच्या आरोपांवर बोलण्यास राहुल गांधी यांचा नकार
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजकारणातील घराणेशाहीवर हल्लाबोल केला. त्यांचा रोख काँग्रेससह देशातील काही प्रादेशिक पक्षांवर होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या आरोपांवर भाष्य करणं टाळलं आहे. 'मी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.
Vinayak Mete: विनायक मेटे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर आज बीडमधील त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघातात रविवारी पहाटे मेटे यांचं निधन झालं होतं. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.
Vinod Tawde: पंतप्रधानांनी लाल किल्यावरून दिलेला संदेश आत्मसात करू; विनोद तावडे यांचं आवाहन
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्ताने लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश सगळ्यांनी नक्की ऐकावा. हाच आजच्या दिनाचा सर्वांसाठीचा संदेश असून पंतप्रधानांनी सांगितलेले पाच संकल्प आत्मसात करू या, असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज इथं केलं.
खडकवासला धरणातून ५५६४ क्युसेकने विसर्ग
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळपर्यंत काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ५५६४ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.८० अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९८.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात २० मि.मी, पानशेत धरण परिसरात १९ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या दोन मि.मी. पावसाची नोंद झाली.
Chhattisgarh Flood : पावसामुळं भिंत कोसळल्यानं छत्तीसगडमध्ये पाच लोकांचा दुर्देवी मृत्यू!
Chhattisgarh Flood News : गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून आता कांकेर जिल्ह्यात भिंत कोसळून पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्यासह तीन बालकांचा समावेश आहे. याशिवाय भिंत कोसळ्यानं त्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबलेले असण्याची शक्यता असल्यानं आता कांकेर जिल्हा प्रशासनानं मदतकार्य सुरू केलं आहे.
काश्मीर: दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान जखमी झालेल्या जवानाचा उपचार सुरू असताना मृत्यू
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमधील नौहत्ता इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान जखमी झालेले पोलीस जवान सरफराज अहमद यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर कालपासून उपचार सुरू होते.
PM Narendra Modi : बिल गेट्स यांनी PM मोदींचं केलं कौतुक!
Bill Gates On PM Modi: आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असतानाच आता प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. भारतातील आरोग्यसेवा आणि डिजीटल क्षेत्रातील झालेल्या बदलांना आणि त्यातील विकासाबद्दल गेट्स यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. याशिवाय त्यांनी या क्षेत्रांमध्ये केलेलं काम हे इतर लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचंही म्हटलं आहे.
Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं एसटी बसचं सारथ्य
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बस आगारात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी जयंत पाटील यांनी चक्क एसटी बसचं सारथ्य केलं.
नागालँडमध्ये चकमकीत आसाम रायफल्सचे २ जवान जखमी
नागालँडच्या मोन जिल्ह्यात आज पहाटे NSCN-KYA च्या संशयित दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. आसाम रायफल्सचे दोन जवान यामध्ये जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या चकमकीत काही दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आसाम रायफल्सने व्यक्त केली आहे.
Independence Day: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री म्हणून मला ध्वजारोहणाची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. गेल्या अडीच तीन वर्षात कोरोनाने आपल्याला बंदीस्त केलं होतं, आज संकट गेलं नाहीय पण आपण या विषाणूने घातलेल्या बेड्या तोडल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य तिरंगा न्हाऊन निघालं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झालंय, आमचं प्राधान्य शेतकरी, सर्वसामान्य आणि दुबळे लोक हेच आहेत. अतिवृष्टीने राज्यात नुकसान झालंय, त्याचा आढावाही घेतला असून पंचनामे सुरू झाले आहेत.
स्त्रीचा अपमान करणाऱ्या गोष्टीपासून मुक्तीचा संकल्प - PM मोदी
मी ही वेदना सांगितल्याशिवाय राहू शकत नाही. मी माझं हे दु:ख कुणाला सांगणार, देशवासियांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार? आपल्यात अशी विकृती आलीय की आपण महिलेचा अपमान करतो, आपण स्वभावाने, संस्काराने, रोजच्या आयुष्यात स्त्रीचा अपमान करणाऱ्या गोष्टीपासून मुक्तीचा संकल्प घेऊ शकतो.
FIR On Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांवर एफआयआर दाखल
Sameer Wankhede Vs Nawab Malik : खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर यूपीएससीची नोकरी लाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडं तक्रारदेखील करण्यात आली होती. परंतु आता या समितीनं वानखेडेंचं जात प्रमाणपत्र वैध ठरवत त्यांना क्लिनचिट दिली आहे. त्यानंतर आता समीर वानखेडेंनी दिलेल्या तक्रारीवरून नवाब मलिकांवर गोरेगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आधीच तुरुंगात असलेल्या मलिकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Independence Day: तिरंगा, मातृभूमीसाठी अनेकांनी यातना सहन केल्या - PM मोदी
स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलताना जंगलातील आदिवासी बांधवांचे स्मरण करायला हवे. स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनून अनेक आदिवासी बांधवांनी मायभूमीसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली. तिंरगा आणि मायभूमीसाठी अनेकांनी यातना सहन केल्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाचे जवान, पोलिस, लोक प्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.
Independence Day: स्वातंत्र्यसैनिकांना नमन करण्याचा दिवस- नरेंद्र मोदी
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी जगभरातील भारतीयांना भारताप्रती प्रेम असणाऱ्या सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यांची ही लढाई संघर्षमय अशी राहिली आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला नमन करण्याचा हा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे संकल्प पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे."