Marathi News 06 October Live: शेअर बाजारात सकारात्मकता कायम; सेन्सेक्स वधारला
Oct 06, 2022, 04:40 PMIST
Marathi News Live Updates: दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात दिसलेलं सकारात्मक वातावरण आजही कायम आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली ‘दिवाळी भेट’ अत्यंत तुटपुंजी. : नाना पटोले
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. विशेषतः महागाई प्रचंड वाढलेली आहे, जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे अशा परिस्थीतीत ज्या चार वस्तू १०० रुपयात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या व अत्यंत तुटपुंज्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने तीन हजार रुपये रेशनकार्डधारकांच्या थेट बँक खात्यात जमा करून सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
Vande Bharat Train Accident: वंदे भारत ट्रेनला गुजरातमध्ये अपघात
वंदे भारत ट्रेनला गुजरातमध्ये मोठा अपघात झाला आहे. ही ट्रेन म्हशींच्या कळपाला धडकून काही म्हशींचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले,२०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल.
Sandeep Lamichhane: क्रिकेटर संदीप लामिछानेला काठमांडू विमानतळावरून अटक, बलात्काराचा आरोप
नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
IND vs SA 1st ODI: मुसळधार पावसामुळे टॉसला विलंब
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना उशीराने सुरु होणार आहे. लखनौमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नाणेफेकीला आणखी विलंब होणार आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Stock Market: शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला
दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात दिसलेलं सकारात्मक वातावरण आजही कायम आहे. आज सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीही १०० हून अधिक अंकांनी वधारून १७,४०० वर ट्रेड करत आहे.
मुंबईत ८० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, एकाला अटक
मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने ८० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. याप्रकरणी केरळमधील तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. ट्रॉली बॅगमध्ये लपवून हेरॉइनची तस्करी करण्यात येत होती.
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, मेस्किको सिटीत १० जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. मेक्सिको सिटीत झालेल्या या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मेक्सिकोतील सिटी हॉलमध्ये गोळीबार झाला, यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महापौरांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात आज पावसाचा यलो अलर्ट
राज्यात हवामान विभागाने आज काही भागात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
West Bengal : दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आला पूर, ७ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक पूर आल्यानं काही जण वाहून गेले असून त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माल नदीच्या पाण्यात बुधवारी दुर्गा विसर्जनावेळी काही जण वाहून गेले. यातील ७ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप काही जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.