Congress on Modi: ‘मोदींच्या सर्व गॅरंटी खोट्या, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हीच मोदी व भाजपची पद्धत’: मल्लिकार्जून खर्गे
Apr 15, 2024, 05:31 PM IST
- भाजपाचे सत्तेवर आल्यास दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. नोकऱ्या कुठे गेल्या, हे आता गडकरी व मोदींना विचारा. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपाची पद्धत आहे.
भाजपाचे सत्तेवर आल्यास दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. नोकऱ्या कुठे गेल्या, हे आता गडकरी व मोदींना विचारा. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपाची पद्धत आहे.
- भाजपाचे सत्तेवर आल्यास दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. नोकऱ्या कुठे गेल्या, हे आता गडकरी व मोदींना विचारा. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपाची पद्धत आहे.
काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात व देशाचे संविधान व लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही, देशात सर्व धर्माचे लोक एकत्र रहावे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे, असं मत कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारसभेत खर्गे बोलत होते.
'काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, काँग्रेसचे लोक देशासाठी फासावर चढले, नरेंद्र मोदींच्या भाजपाचे लोक स्वातंत्र्य चळवळीत कुठे होते? स्वातंत्र्यांच्या लढाईच्यावेळी आरएसएसचे लोक कुठे लपून बसले होते? असा सवाल खर्गे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मनुवादी विचाराच्या सरकारचा पराभव करा, असे आवाहन मल्लिकार्जून खर्गे यांनी केले
राम मंदिराच्या उदघाटनाला राष्ट्रपतींना का बोलावले नाही?
खर्गे म्हणाले, 'भाजप धर्माच्या नावावर मते मागत आहे. काँग्रेसला राम मंदिर उदघाटनाचे निमंत्रण दिले, पण ते आले नाहीत असा खोटा प्रचार नरेंद्र मोदी करत आहेत. प्राणप्रतिष्ठेचे काम साधू संतांचे आहे पण हे नवीनच साधू निघाले आहेत. दलित समाजाला आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही, तर मी एकटा मंदिरात कसे जाऊ? नवीन संसदेच्या पायाभरणीला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नाही. नवीन संसदेच्या उदघाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. राम मंदिराच्या उदघाटनालाही बोलावले नाही. ते राष्ट्रपती असूनही मागासवर्गीय असल्याने भाजपा व मोदींनी त्यांना न बोलावून दलित समाजाचा अपमान केला. मोदी व भाजपा एससी, एसटी, आदिवासी समाजाचा सातत्याने अपमान करत आहेत, हा अपमान आधी बंद करा, असं खर्गे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपानेच कायम ठेवले असे नरेंद्र मोदी सांगत आहेत, ते साफ खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनी संविधान बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली व ते संविधान आजपर्यत काँग्रेस पक्षाने टिकवून ठेवले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाबासाहेबांचा फोटोही लावत नाहीत व कालपर्यंत देशाचा तिरंगा झेंडाही आरएसएसच्या कार्यालयावर फडकवला नाही.
दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?
भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. गेल्या १० वर्षातील २० कोटी नोकऱ्या कुठे गेल्या, हे आता गडकरी व मोदींना विचारा. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देतो म्हणाले. पण हे पैसेही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपाची पद्धत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करु नका असे म्हणणाऱ्या मोदींनीच २३ भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले. विरोधी पक्षात होते तोपर्यंत भ्रष्टाचारी आणि भाजपात आले की पवित्र झाले का? असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, कामगारांचे अधिकार व हक्क कायम करणार, सामाजिक सुरक्षा देणार. शेतमालाला एमएसपीचा कायदा, पीकविम्याचे पैसे ३० दिवसात देणार. जीएसटीमुक्त शेती करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिली असल्याचे खर्गे म्हणाले.
प्रचार सभेआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.