मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023 Play Off : प्लेऑफच्या एका स्थानासाठी तीन संघात चुरस, आरसीबीला किती संधी? जाणून घ्या

WPL 2023 Play Off : प्लेऑफच्या एका स्थानासाठी तीन संघात चुरस, आरसीबीला किती संधी? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 20, 2023 11:36 AM IST

wpl 2023 play off equation : डब्ल्यूपीएलच्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रवेश केला आहे. आता यूपी वॉरियर्स तिसऱ्या स्थानासाठीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

wpl 2023 play off equation
wpl 2023 play off equation

डब्ल्यूपीएलचा पहिलाच हंगाम अतिशय रोमांचक पद्धतीने सुरू आहे. स्पर्धेत फक्त ५ संघ आहेत, पण दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या स्पर्धेत जबरदस्त सामने पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने एकतर्फी वर्चस्व गाजवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, तर दिल्ली कॅपिटल्सनेही दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

आता प्लेऑफच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस रंगली आहे. UP वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात जायंट्स यांच्यापैकी कोणाला ही जागा मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WPL 2023 मध्ये फक्त ५ संघ असल्यामुळे बीसीसीआयने या स्पर्धेचे स्वरूप लहान ठेवले आहे. या अंतर्गत, साखळी टप्प्यातील सर्व सामने संपल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल आणि विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

यूपी वॉरियर्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. यूपीचे ६ सामन्यात ६ गुण आहेत. त्यांचे आणखी २ सामने आहेत. जे गुजरात जायंट्स (२० मार्च) आणि दिल्ली कॅपिटल्स (२१ मार्च) विरुद्ध आहेत. यूपीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त २ गुणांची गरज आहे. म्हणजेच कोणत्याही एका सामन्यात विजय आवश्यक आहे. एक सामना हरला आणि दुसरा सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने रद्द झाला तरी त्यांना एक गुण मिळेल आणि ते पुढच्या फेरीत पोहोचू शकतात. युपीचा नेट रनरेट -०.११७ आहे. जर युपीने दोन्ही सामने गमावले तर तो कमी होईल.

आरसीबीला किती संधी?

लागोपाठ दोन मोठ्या विजयांसह बंगळुरूने केवळ ४ गुणच वाढवले ​​नाहीत तर नेट रनरेटमध्येही सुधारणा केली आहे. त्यांचे ७ सामने झाले असून शेवटच्या सामन्यात त्यांना २१ मार्चला मुंबईचा सामना करायचा आहे. आरसीबी फक्त ६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, अशा स्थितीत त्यांना मुंबईचा मोठ्या फरकाने (सुमारे ५०-६० धावा) पराभव करावा लागेल. सोबतच, यूपीने आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले पाहिजेत, अशी प्रार्थना करावी लागेल.

गुजरातचा गेम ओव्हर!

गुजरातचाही फक्त एक सामना बाकी आहे, जो सोमवारी (२० मार्च) यूपी विरुद्ध आहे. गुजरातचेही केवळ ६ अंक आहेत. म्हणजे गुजरातचे प्लेऑफ मध्ये पोहोचणे कठीण आहे. कारण त्यांचा NRR सर्वात वाईट आहे. गुजरातचा नेट रनरेट -२.५११ आहे.

WhatsApp channel