Virat Kohli: रोहित आणि द्रविड विराटला पाठिशी का घालतायत? खरं कारण आलं समोर
विराट कोहलीचा (virat kohli) ट्रॅक रेकॉर्ड पाहता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड त्याच्या पाठीशी आहेत, असा विश्वास टीम इंडियाचा माजी क्रिकेटर प्रज्ञान ओझाने (Pragyan Ojha) व्यक्त केला आहे.
भारताचा (team india) स्टार फलंदाज विराट कोहली (virat kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही, की मॅचविनिंग इनिंग खेळता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही होत आहे. एकीकडे कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत.
अशातच प्रज्ञान ओझाने विराट कोहली बाबत मोठे विधान केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड विराटला सातत्याने पाठिशी का घालत आहेत, याचा खुलासा केला आहे,
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गेल्या १० वर्षात संघासाठी जे काही केले आहे, त्यामुळेच कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या पाठीशी आहेत, असा विश्वास टीम इंडियाचा माजी क्रिकेटर प्रज्ञान ओझा याने व्यक्त केला आहे.
प्रज्ञान ओझा याने जेमी ऑल्टरशी संवाद साधताना सांगितले की, ‘१० वर्षांत ७० शतके करणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. मला सांगा, असे आणखी किती खेळाडू तुम्हाला माहीत आहेत? यामुळेच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड विराट कोहलीला पाठीशी घालत आहेत. त्यांना माहित आहे की विराट कोहली त्याच्या फॉर्मपासून फक्त एक चांगली खेळी दूर आहे, एकदा असे झाले की आपण जुना कोहली पाहू शकता’.
इंग्लंड दौऱ्यावर विराटची कामगिरी-
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावरही विराटला खास काही करता आले नाही. कोहलीने इंग्लंड दौऱ्यावर ११, २०, १, ११ आणि १६, १७ अशा धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याच्या फॉर्मवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विराटचे शेवटचे शतक २०१९ मध्ये-
विराट कोहली अडीच वर्षांपासून शतक आणि ५ महिन्यांपासून अर्धशतक करू शकला नाही. कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने १३६ धावांची खेळी केली होती. तेव्हापासून विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) शतक झळकावता आलेले नाही.