मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsIRE: हार्दिक पांड्या आज इतिहास रचणार, तब्बल ६३ वर्षांनंतर 'असं' घडणार

INDvsIRE: हार्दिक पांड्या आज इतिहास रचणार, तब्बल ६३ वर्षांनंतर 'असं' घडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 08:01 PM IST

हार्दिक कर्णधार म्हणून मैदानात उतरताच तब्बल ६३ वर्षांनंतर एका इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. यापूर्वी १९५९ मध्ये हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मंकड, गुलाबराय रामचंद आणि पंकज रॉय यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, तेव्हा फक्त कसोटी क्रिकेटच खेळले जायचे.

hardik pandya
hardik pandya

भारत आणि आयर्लंड (India tour of Ireland) यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री ९ वाजता सुरु होईल.

या मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे (hardik pandya) भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली असून भुवनेश्वर कुमारला (bhuvaneshwar kumar) उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आज या मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक कर्णधार म्हणून मैदानात उतरताच तब्बल ६३ वर्षांनंतर एका इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

२०२२ मध्ये आतापर्यंत ४ खेळाडूंनी भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच हार्दिक या वर्षात कर्णधार बनणारा ५ वा भारतीय कर्णधार ठरणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ६३ वर्षांनंतर पुन्हा एकदा असे घडणार आहे. जेव्हा एकाच वर्षात ५ खेळाडू भारतीय संघाची धुरा सांभाळतील. यापूर्वी १९५९ मध्येही ५ खेळाडूंनी भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. १९५९ मध्ये हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मंकड, गुलाबराय रामचंद आणि पंकज रॉय यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, तेव्हा फक्त कसोटी क्रिकेटच खेळले जायचे.

यावर्षी आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल आणि रिषभ पंत यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहली भारतीय संघाच कर्णधार होता. यानंतर कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर उर्वरित २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये के एल राहुलने या मालिकेत टीम इंजियाचे नेतृत्व केले.

यानंतर रोहित शर्माने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले. रिषभ पंत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत हे इंग्लंडविरुद्धच्या संघात आहेत. तर के एल राहुल जखमी झाला आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे.

पहिल्या टी-२० सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया-

इशान किशन, ऋतुराज गायकवाड/राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि हर्षल पटेल.

WhatsApp channel