Rohit Sharma: संघासाठी काय पण! ९व्या क्रमांकावर येऊन हिटमॅननं बांगलादेशला झोडपलं
Rohit Sharma IND Vs BAN 2nd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्या २६६ धावाच करू शकला.
बांगलादेशने भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केले. यासोबतच बांगलादेशने वनडे ३ सामन्यांची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, असे असले तरी टीम इंडियाचा जिगरबाद कर्णधार रोहित शर्माने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याने ९व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन बांगलादेशी गोलंदाजांची पिसे काढली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रोहितने २८ चेंडूत ३ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांसह ५८ कुटल्या.
हिटमॅन रोहित शर्माला वाघाच्या काळजाचा कर्णधार मानले जाते. कठीण परिस्थितीतही शांत राहून तो जबरदस्त निर्णय घेत असतो. बांगलादेशविरुद्धही त्याने असेच काहीसे केले. हाताच्या अंगठ्याची दुखापत गंभीर असूनही तो संघासाठी जखमी अवस्थेत मैदानात उतरला. यानंतर कसोटी मालिका तसेच, पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकपसारखी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीतही विचार न करता रोहित शर्मा ९व्या क्रमांकावर फलंदाजीस आला.
रोहितची दुखापत गंभीर आहे. त्याला सामन्यातून बाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता पण संघ अडचणीत असल्याचे पाहून त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कॅच घेताना झाली दुखापत
सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला दुखापत झाली होती. एक झेल पकडताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रोहितलाही रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळानंतर तो स्टेडियममध्ये परतला, पण त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला पट्टी बांधलेली होती. अशा परिस्थितीत तो क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. तसेच सलामीला फलंदाजीसदेखील आला नाही.
रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तिथून त्याने एकट्याच्या बळावर सामना जवळपास फिरवला. बोटाला दुखापत झाल्यानंतरही रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात भारताला २० धावांची गरज होती. चेंडू मुस्तफिजुर रहमानच्या हातात होता आणि रोहित स्ट्राईकवर होता.
पण या षटकात रोहितला केवळ १५ धावाच करता आल्या आणि सामना बांगलादेशने ५ धावांनी जिंकला.
४८ वं षटक ठरलं सामन्याचा टर्निंग पॉईंट
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत ४० धावांची गरज होती. ४८वे षटक मेडन गेले. त्याचवेळी ४९व्या षटकात महमुदुल्लाह गोलंदाजीसाठी आला. या षटकात टीम इंडियाने २० धावा केल्या. रोहितने २ षटकार ठोकले. त्याचवेळी ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिराज क्लीन बोल्ड झाला. अशाप्रकारे शेवटच्या षटकात २० धावा शिल्लक होत्या, पण टीम इंडियाला केवळ १५ धावा करता आल्या.