Asia Cup 2022: आशिया चषकात ‘हे’ ५ फलंदाज घालू शकतात धुमाकूळ, जाणून घ्या
Top 5 Batsman in Asia Cup 2022: आशिया कप २०२२ सुरू झाला आहे. मात्र, स्पर्धेतील मुख्य सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
आशिया कप २०२२ स्पर्धेतील मुख्य सामने २७ ऑगस्टपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. जे सामना एकहाती आपल्या पारड्यात फिरण्यात माहीरआहेत. भारत-पाक सामन्यापूर्वी अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
बाबर आझम-
या यादीत पहिले नाव २७ वर्षीय पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचे आहे. बाबर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या १२ डावात त्याने ८२८ धावा केल्या आहेत. यावरून त्याच्या फॉर्मचा अंदाज लावता येतो. या १२ सामन्यांमध्ये तो ६ एकदिवसीय, २ कसोटी, १ टी-20 सामना खेळला आहे. यादरम्यान त्याने८ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.
बाबरने एकूण ७४ टी-२० सामने खेळताना ६९ डावांमध्ये ४५.५ च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि २६अर्धशतके झळकावली आहेत.
सुर्यकुमार यादव-
भारत-पाक सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. त्याच्याकडे मैदानात चौफेर फटके मारण्याची क्षमता आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत तो बाबरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सुर्याने आतापर्यंत २३ टी-२० सामने खेळताना २१ डावात ३७.३ च्या सरासरीने ६७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि ५ अर्धशतके आली आहेत.
मोहम्मद रिझवान-
या यादीत तिसरे मोठे नाव पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचे आहे. ICC T20 विश्वचषक २०२१ मध्ये बाबरसोबत भारताविरुद्ध केलेली अखंड भागीदारी कोण विसरू शकेल. त्या खेळीपासूनच रिझवान क्रिकेट जगतात फेमस झाला. तो आपल्या संघासाठी दिवसेंदिवस उत्तम कामगिरी करत आहे.
रिजवानने ५६ टी-20 सामने खेळताना ४५ डावांमध्ये ५०.३६ च्या सरासरीने १६६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.
हार्दिक पंड्या-
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएलपासून जबरदस्त लयीत आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
पंड्याने आतापर्यंत ६७ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान त्याने ४८ डावांमध्ये २३.२ च्या सरासरीने ८३४ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने २७.८ च्या सरासरीने ५८ डावांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत.
रोहित शर्मा-
या यादीतील पाचवे मोठे नाव भारतीय कर्णधार रोहित शर्माचे आहे. रोहित गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात नक्कीच अपयशी ठरला आहे. मात्र, त्याचे फलंदाजीचे कौशल्य सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तो विरोधी संघांना नक्कीच धोकादायक ठरु शकतो.
रोहितने भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये १३२ खेळताना १२४ डावांमध्ये ३२.३ च्या सरासरीने ३४८७ धावा केल्या आहेत. या दरम्याने त्याने ४ शतके आणि २७ अर्धशतके झळकावली आहेत. T20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४०.३ इतका आहे. यावरून त्याची आक्रमकता दिसून येते.