Rohit Sharma Captaincy : अनिल कुंबळेंचा फोन आला अन् कर्णधार झालो, रोहित शर्माचा खळबळजनक दावा
Rohit Sharma Captaincy : अनिल कुंबळेने मला फोन करून संघाचं कर्णधारपद देण्यात आल्याचं सांगितलं होतं, असं म्हणत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.
Rohit Sharma Mumbai Indians Captaincy : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जाणारा रोहित शर्माने नुकत्याच एका स्पोर्ट्स चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यात तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार कसा झाला, याबाबद्दल रोहितने रोखठोकपणे सगळंच सांगितलं आहे. २०१३ साली रोहितने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्यानंतर आयपीएलच्या दहा हंगामापासून तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. परंतु आता यंदाचा आयपीएलचा हंगाम सुरू झालेला असतानाच रोहित शर्माने तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार कसा झाला?, याबाबात मोठा खुलासा केला आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या एका मुलाखतीत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, २०१३ साली आयपीएलमध्ये आमच्या संघाने सहा सामने खेळले होते. त्यातील तीन सामन्यांमध्ये आम्ही पराभूत झालो होतो. परंतु सातवा सामना सुरू होण्यापूर्वीच मला अनिल कुंबळे यांचा फोन आला. त्यांनी पुढील सामन्यात तू मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार असल्याचं सांगितलं. त्यांनी घेतलेला निर्णय ऐकून मला धक्काच बसला. ते माझी गंमत करत असावेत, असं मला वाटलं होतं, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मला अनेक बदल जाणवले, माझं सगळं सामान नॉर्मल रुममधून स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आल्याचं समजताच मला कर्णधार झाल्याच्या माहितीवर विश्वास बसला, असंही रोहित म्हणाला.
सामना सुरू होण्यापूर्वी मी अनिल कुंबळे यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी स्वत:हून मला टीम निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. असं सहसा होत नाही, परंतु खेळाडूंच्या निवडीबाबत मला विचारण्यात आलं होतं, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे. माझं मत विचारात घेतलं जात असल्यामुळं मला नावासाठी कर्णधार बनवण्यात आलेलं नाही, असं कळालं. त्यानंतर माझ्या कॅप्टन्सीमध्ये आम्ही कोलकात्यात केकेआरविरुद्ध खेळलो आणि तो सामना जिंकलोही, असं रोहित शर्मा मुलाखतीत म्हणाला आहे.