NIA-ED च्या कारवाईविरोधात PFIने दिली बंदची हाक, समर्थकांकडून तोडफोड
PFI Strike Against NIA Raid: एका बाजुला पीएफआयकडून बंदची हाक दिली गेली असताना केरळ भाजपकडून हा बंद अनावश्यक असल्याचं म्हटलं आहे.
PFI Strike Against NIA Raid: पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाने राष्ट्रीय तपास संस्थेकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांविरोधात आता बंद पुकारला आहे. एनआयए आणि ईडीने काल देशभरात अनेक ठिकाणी पीएफआयच्या नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. आज शुक्रवारी पीएफआयने बंद पुकारला आहे. सकाळी ६ ते रात्री ६ वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केरळमध्ये केलं आहे. दरम्यान, या बंदला पाठिंबा देणाऱ्यांनी तिरुवनंतपुरममध्ये एका रिक्षाचे आणि कारचे नुकसान केले आहे.
पीएफआय़चे राज्य महासचिव अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं की, केंद्रीय संस्थांचा वापर हा विरोधातील आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. पीएफआयच्या नेत्यांना अटक करणं योग्य ठरवता येणार नाही.
पीएफआयने संपाबाबत दिलेल्या निवेदनानुसार, राज्य समितीने नेत्यांना अटक ही राज्य पुरस्कृत दहशतवादाचा भाग होती. तर पीएफआयच्या महासचिवांनी सांगितले की, RSS च्या नेतृत्वातील सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार विरोधात आवाज उठवणांऱ्यांवर दबाव आणला जात आहे. याविरोधात आम्ही बंद पुकारणार आहोत.
दरम्यान, एका बाजुला पीएफआयकडून बंदची हाक दिली गेली असताना केरळ भाजपकडून हा बंद अनावश्यक असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी असं भाजपने म्हटलं आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी आरोप केला की, पीएफआय़कडून सभा बोलावली तेव्हा दंगल झाली आहे. राज्याच्या प्रशासनाने लोकांचे जीवन आणि मालमत्ता यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे.
के सुरेंद्रन यांनी असाही आरोप केला की, पीएफआय ताकदीच्या जोरावर दहशतवादाची प्रकरणे गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं की, भारत हा लोकशाही असलेला देश आहे, हे धार्मिक राष्ट्र नाही.
एनआयए, ईडी आणि राज्य पोलिस दलाच्या पथकाने गुरुवारी संयुक्त कारवाई केली. यात १०० हून अधिक पीएफआयच्या नेत्यांना अटक केली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्तरित्या जवळपास १० राज्यात छापा टाकला. यावेळी केरळमधील २२ लोकांना अटक केली. महाराष्ट्र, कर्नाटकातून २०, आंध्र प्रदेशातून ५, आसाममधून ९, दिल्लीतून ३ आणि उत्तर प्रदेशातून ८ आणि राजस्थानमधून २ लोकांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या