Bacchu Kadu Statement On Assam : महाराष्ट्रात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचं सांगत राज्यातील मोकाट कुत्र्यांना आसाममध्ये पाठवावं, कारण आसाममधील लोक कुत्र्यांचे मांस खातात, असं वादग्रस्त वक्तव्य करत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आसामच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. आसामचे राज्यपाल गुलाबसिंह कटारिया यांच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील आमदाराच्या वक्तव्यामुळं थेट आसामच्या विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत बोलताना राज्यातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याचा प्रस्ताव थेट विधानसभेत मांडला होता. त्यावर आसाममधील आमदारांनी आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एआययूडीएफचे आमदार रफीकुल इस्लाम यांनी विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजित दैमरी यांना विशेषाधिकाराचा वापर करत बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय अपक्ष आमदार अखिल गोगोई आणि सीपीआयचे (एम) आमदार मनोरंजन तालुकदार यांनी 'बच्चू कडू यांनी आसामच्या विधानसभेत येऊन माफी मागावी', अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दिला.
सरकार त्यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याचं कारण देत विरोधकांनी सभात्याग केला. आसामचे लोक कुत्रे खात असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आसाममधील काँग्रेसच्या आमदारांनीही बच्चू कडू यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये जात आसाम सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी विरोधी आमदारांना फटकारल्यानंतर अनेक आमदार विधानसभेतून निघून गेले.
संबंधित बातम्या