अग्निपथ विरोधात आंदोलनाचा भडका, बिहारमध्ये रेल्वे जाळली
Agneepath योजनेला वाढत्या विरोधानंतर सरकारकडून एक वर्षासाठी वयोमर्यादा २१ वरून २३ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून मंगळवारी लष्कर (Indian Army) भरतीसाठी अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा करण्यात आली. मात्र या योजनेला देशातील अनेक राज्यांमधून विरोध केला जात आहे. लष्कर भरतीची तयारी करणारी तरुणाई या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) तरुणांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली तर काही ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या आहेत. योजनेला वाढत्या विरोधानंतर सरकारकडून एक वर्षासाठी वयोमर्यादा २१ वरून २३ करण्यात आली आहे.
बिहारमध्ये हे आंदोलन सर्वाधिक तीव्र आहे. पटनातील बख्तियारपूरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी २० राऊंड फायर केले आहेत. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता आणि तणावाचे वातावरण होते. भिखणा पडाडीपासून ते मुसल्लहपूरपर्यंत तोडफोडीच्या घटना घडत आहेत. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
अग्निपथ योजनेला सर्वाधिक विरोध हा बिहारमधून होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलक विद्यार्थी रस्त्यावर उतरुन या योजनेचा निषेध करत आहेत. अनेक रेल्वे गाड्यांना आग लावण्याचे प्रयत्न केले गेले. २ रेल्वेंच्या डब्यांना आग लावण्यात आली असून तोडफोडही कऱण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितले. तसंच पोलिस या सर्व घटनेचे व्हिडीओ शूट करत असताना त्यांचे मोबाईल आंदोलकांनी हिसकावून घेतले.
बिहारच्या समस्तीपूर स्टेशनमध्ये उभा असलेल्या जयनगर-अमृतसर एक्सप्रेस, दरभंगा- दिल्ली क्लोन एक्सप्रेस, भागलपूर-जम्मूतवी अमरनाथ एक्सप्रेसमध्ये तोडफोड कऱण्यात आल्याचा घटना घडल्या आहे. चौकशी कार्यालयातही आंदोलकांनी गोंधळ घालत साहित्य फेकून देत तोडफोड केली. स्टेशनवर असलेलं साहित्य फेकून देण्यात आलं. अनेक दुकाने यामुळे दुकानदारांनी बंद केली. आंदोलकांशी झालेल्या झटापटीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या