Bus Accident : दिवाळीला घरी जाणाऱ्या कामगारांवर काळाचा घाला; बस अपघातात १४ जणांचा मृत्यू, ४० जखमी
Road Accident In Madhya Pradesh : अपघातावेळी बसमध्ये तब्बल ५४ प्रवासी होते. त्यातील १४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Road Accident In Madhya Pradesh : दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांवर काळानं घाला घातल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यात एका बसला अपघात झाला असून त्यात १४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अपघातावेळी बसमध्ये ५४ प्रवासी होते. त्यापैकी ४० प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातल्या मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बसला अपघात झाला असून त्यात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बस तेलंगणाच्या हैदराबादहून यूपीतील गोरखपूरला जात होती. रात्री साडेअकराच्या सुमारास बसला मोठा अपघात झाला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच रिवा पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले.
पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू...
रिवामध्ये बसला अपघात झाल्याची माहिती समजताच पोलिसांच्या विशेष पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. त्यात ४० प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधील बहुतांश प्रवासी हे कामगार होते. ते दिवाळीच्या सणासाठी घरी जात होते. त्यावेळी हा अपघात झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दिवाळीच्या सणातच दुखाचा डोंगर कोसळला आहे. रिवामधील हा बस अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणांमुळं झाला, याची माहिती अजून समोर आलेली नाही.