बंडखोरांनी परतीचे मार्ग स्वत:च बंद केले आहे; शिवसेनेचे उपनेते सचिन आहिर यांनी केले स्पष्ट
आजही उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद घालून परत आले तर त्यांचे स्वागत आहे, असेही आहिर म्हणाले.
Maharashtra political crisis शिवसेनेच्या बंडखोर आमदार, मंत्र्यांना आम्ही वारंवार परत या असे सांगितले. तसेच बोलून समोरा समोर चर्चा करू असेही सांगितले. यासाठी त्यांना अनेकदा मुदतही दिली. मात्र, याला त्यांनी काहीच प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे आता चर्चेची वेळ निघून गेली आहे. ही चर्चेची द्वारे त्यांनी स्वत:च बंद केली आहे. त्यामुळे पक्षाला निर्णय घ्यवा लागला असे, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांनी सांगितले. ते जर आजही उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साद घालून परत आले तर त्यांचे स्वागत आहे, असेही आहिर म्हणाले.
आकुर्डी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आहिर म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असताना आता सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. त्यांना उद्या (मंगळवार) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले असून, गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. हे काही चालले आहे ते अत्यंत दुदैर्वी आहे. यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जातंय. ही चौकशी नंतर ही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतोय का? पण, तरीही निर्भीडपणे ते जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणार, असा आमचा निश्चय आहे.
आहिर म्हणलो, आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांसमोर आहे. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेलाच नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाही. शेवटी न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या