TET Scam : अब्दुल सत्तारांनी फेटाळले TET घोटाळ्याचे आरोप; म्हणाले..
कथित TET घोटाळ्या प्रकरणी अपात्र करण्यात आलेल्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली आणि मुलांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Maharashtra TET Scam : राज्यातील कथित TET घोटाळ्याने आता वेगळे वळण घेतले आहे. परीक्षा परिषदेने रद्द केलेल्या जवळपास ७ हजार ८७४ नावांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव पुढे आले आहे. यामुळे सत्तार यांच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्तीत केले जात आहेत. त्यांच्या मुलांची नावे बाहेर आल्याने सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार म्हणाले, माझ्या बदनामीसाठी हा सगळा कट विरोधकांनी रचला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा अशी मागणी सत्तार यांनी केली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या चारही मुलांची नावे या घोटाळ्यात पुढे आली आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत ही नावे आहेत. हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी त्यांची नावे असून सध्या एका शिक्षण त्या संस्थेत कार्यरत आहेत. १०२ आणि १०४ क्रमांकावर त्यांची नावं आहेत. सत्तार त्यांनी त्यांच्या मुलींना त्यांच्याच संस्थेत लाऊन त्या पात्र नसताना त्यांना पगार काढल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण बाहेर आल्यावर चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना आता शिक्षण मंत्री केले जाईन असा खोचक टोला लगावला. यावर आक्रमक होत अब्दुल सत्तार यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
सत्तार म्हणाले, माझ्या मुलांची नावे जेव्हा पुढे आली तेव्हा मीच हे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी रद्द झालेल्या नावाची यादी ही बाहेर काढली. या प्रकरणात माझी जाऊन बुजून बदनामी केली जात आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी. माझ्या ज्या मुलाचे नाव या यादीत आले आहे, त्याने कधीही TET परीक्षा दिली नसून, तो एलएलबी (कायद्याच्या अभ्यास) करत आहे. माझ्या दोन्ही मुलींनी TET ची परीक्षा दिली आहे. मात्र, त्या अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांचा याच्याशी काहीही संबध नाही. आता चार वर्षांनी अपात्र झाल्याची यादी समोर आली आहे. याबद्दल शिक्षण आयुक्ताना तुम्ही विचार की मुलाची नावे यात कशी आली. जर माझ्या मुलांनी गैर प्रकार केला असेल तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हावी. त्यांची जी नावे आली आहेत त्याचा संबंध हा शिक्षण विभागाशी आहे. आम्ही काही केले असते तर शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोकरी मागितली नसती का?, त्यांना प्रमाणपत्र दिला नसता का?, माझ्या मुलींनी घोटाळा केला असता तर आम्ही चार वर्षे त्याचा फायदा घेतला नसता का? असे प्रश्न सत्तार यांनी उपस्तीत केले.
सध्या या घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सत्तार यांनी केली. शिवाय, आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर जरूर कारवाई व्हावी, पान जर दोषी आढळलो नाही तर ज्यांनी कुणी माझ्या मुलांची नावे यादीत घातली आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
विभाग