संजय राऊतांचं विरोधी पक्षांना इंग्रजीतून पत्र; तीन मराठी शब्दांची जोरदार चर्चा
Sanjay Raut Letter to Opposition Leaders: ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेलं पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Sanjay Raut Letter to Opposition Leaders: शिवसेनेची धडाडती तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्या अटकेचा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एकमुखी निषेध होत असतानाच राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेलं एक पत्र सध्या व्हायरल झालं आहे. इंग्रजीतून लिहिलेल्या या पत्रात केवळ तीन शब्द मराठी आहेत. या शब्दांतून राऊत यांचा निर्धार व्यक्त होत असून हे पत्र सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे.
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून संजय राऊत यांनी हे पत्र लिहिलं आहे. राजकीय कटकारस्थान आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार करत असलेल्या हल्ल्याच्या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल संजय राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. आपला विश्वासू आणि खरा मित्र कोण हे कठीण काळातच समजतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य त्यांनी पत्रात उद्धृत केलं आहे. 'रडायचं नाही लढायचं' असं शिवसेनाप्रमुख सतत सांगायचं. त्याचे हे शब्द प्रमाण मानून सत्यासाठी माझी लढाई सुरूच राहील आणि कुठल्याही दबावापुढं मी झुकणार नाही. ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा माझा निर्धार आहे आणि तो कुणीही तोडू शकणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
संसदेत व संसदेच्या बाहेर माझ्यासाठी आवाज उठविणाऱ्या माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांना व इतर सदस्यांना सहकार्य केल्याबद्दलही विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. शब्दांतून, कृतीतून आणि आपल्या विचारांतून आपण सर्वांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
वेळ आणि संयम हे सर्वात मोठे योद्धे असतात… हा विचार, बाळासाहेबांची शिकवण, उद्धव ठाकरे यांच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि हितचिंतकाच्या ठाम पाठिंब्याच्या बळावर देशाच्या विचारधारेसाठी सुरू असलेल्या या युद्धात मी नक्कीच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वांना शुभेच्छा देतानाच लवकरच भेटू असंही राऊत यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
विभाग