Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्याने महाआघाडीची ‘वज्रमूठ’ ढिली, पुढच्या सर्व सभा रद्द?
mahavikas aghadi vajramuth sabha : महाविकास आघाडीच्यापुण्यात होणाऱ्या सभेसह पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होणारअसल्याची माहिती राजकीयसूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्यात खळबळ माजली असताना याचा परिणाम महाविकास आघाडीवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यात होणाऱ्या सभेसह पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होणारअसल्याची माहिती राजकीयसूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींचा परिणाम म्हणून आगामी सर्व वज्रमूठ सभा रद्द होत आहेत. पुणे, कोल्हापूर, नाशिक इथे आगामी सभा होणार होत्या. पुण्याला होणाऱ्या सभेच्या आयोजनाची जबाबदारी अजित पवारांवर आहे. मात्र राष्ट्रवादीमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकासआघाडीवर काय परिणाम होणार? राष्ट्रवादीची पुढची रणनिती काय असणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
त्यातच आता महाविकासआघाडीच्या पुढच्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र शरद पवारांच्या राजीनाम्याचा आणि वज्रमूठ सभा रद्द होण्याचा काही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कडक उन्हामुळे वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याची चर्चा मुंबईतील सभेवेळीच करण्यात आली होती.
शरद पवारांच्या राजीनाम्याचा वज्रमूठ सभेवर काही परिणाम झालेला नाही. सध्या आम्ही वज्रमूठ सभा आणि महाविकासआघाडीबाबत चर्चा करत नसून राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींवर चर्चा केली जात आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.