Rahul Kul : संजय राऊत यांच्या आरोपानंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Kul on Sanjay Raut Statement : खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहराचे आरोप केले. त्यांच्या आरोपावर राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : राज्यात ईडीच्या कारवाईवरुन वादंग सुरू असताना खासदार संजय राऊत हक्कभंग समितीच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस करखान्यात केलेल्या गैरव्यवहारावरुन संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून कुल यांनी कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राहुल कुल यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर आपली बाजू स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप राजकीय असल्याचे कुल म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत राहुल कुल यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. कुल म्हणाले, संजय राऊतांनी माझ्यावर नैराश्येतून आरोप केले आहेत. त्यांना वस्तुस्थितीची माहिती नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. गेल्या २० ते २२ वर्षांपासून मी भीमा पाटस कारखान्याचा अध्यक्ष आहे. हा कारखाना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहे. राऊतांनी केलेले आरोप हे पूर्णत: राजकीय असून राजकारणात अशा प्रकारे आरोप होणं स्वाभाविक आहे. मी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी आहे. हे आरोप नेमके आताच का झाले, हे समजून घेणं गरजेचं आहे असेही कुल म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांच्या साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला आतो. भ्रष्टाचाराचा धर्म व राजकीय पक्ष नसतो. या मताचा मी आहे.
पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील ‘भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रापयांचे “मनी लॉडरिंगचे आहे. कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटीच गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता.
विभाग