Matoshree : ‘मातोश्री’चं महत्त्व का कमी झालं?; माजी मंत्र्यानं दाखवलं उद्धव ठाकरेंकडं बोट
Ashish Shelar taunt Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्रीबद्दल लोकांच्या मनात एक आदर होता. मात्र, आता हे महत्त्व कमी झालं आहे, असा आरोप भाजपनं केला आहे.
Ashish Shelar taunt Uddhav Thackeray : हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरे यांचा 'दरवाजे खटखटाव, भाई दरवाजे खटखटाव' असा कार्यक्रम सुरू आहे. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टीआरएसचा दरवाजा खटखटवतात. आता राहुल गांधींचं दार खटखटवायला जातील, अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.
ट्रेंडिंग न्यूज
राष्ट्रीय पातळीवर सध्या भाजपविरोधात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्या-राज्यांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उद्धव ठाकरे हे देखील लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यावरून शेलार यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत होते, तोपर्यंत प्रत्येकजण 'मातोश्री’वर जात होता. मातोश्रीचा एक आदर होता. मात्र, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या दिवसापासून त्यांना मतांसाठी अनेकांच्या दारोदारी भटकावं लागत आहे. मातोश्रीचं महत्त्व त्यांनीच कमी केलं, अशी टीका शेलार यांनी केली.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका म्हणजे वादळाची भीती आहे. अमित शाह येणार म्हणजे तुफान येणार, हे माहीत असल्यामुळं छोट्या छोट्या बिळातील प्राणी चिवचिवाट करत आहेत, असा टोला त्यांनी हाणला.
संविधानामुळंच संजय राऊत यांना जामीन
भाजपनं देशात संविधान ठेवलेलंच नाही, असा आरोप संजय राऊत करत असतात. त्याचाही शेलार यांनी समाचार घेतला. 'संजय राऊत यांनी संविधान धोक्यात आहे हे म्हणू नये. संविधानामुळेच त्यांना जामीन मिळाला आहे म्हणून ते जेलच्या बाहेर आहेत, असा टोला शेलार यांनी हाणला. अनिल परब, हसन मुश्रीफ यांना जो अंतरिम दिलासा वारंवार मिळतोय, त्याचीही त्यांनी आठवण करून दिली.