Dadar Fire: दादरच्या आगीमुळे मुंबईच्या राजकारणात ठिणगी; भाजपचा आमदार म्हणतो…
Kalidas Kolambkar On Dadar Fire: मुंबईच्या दादर येथे लागलेल्या आगीच्या घटनेला मुंबई महापालिकेला जबाबदार ठरवत भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली.
Politics over Mumbai Fire Incident : मुंबईच्या दादर पूर्व परिसरात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास रहिवाशी इमारातीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सध्या येथे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. परंतु, या आगीच्या घटनेमुळे मुंबईच्या राजकारणात ठिणगी पडल्याचे दिसून आले. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आगल्याचा आरोप भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला आहे. कालिदास कोळंबकर यांच्या वक्तव्यावर अद्याप विरोधकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
या आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया देत कालिदास कोळंबकर म्हणाले की, "दादर पूर्व येथील आर ए रेसिडेन्सी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. आग ४२व्या मजल्यावर असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अधिक वेळ लागला. कारण, क्रेन तेवढ्या उंचीवर पोहोचू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांवरुन पाईप घेऊन ४२व्या मजल्यापर्यंत जावा लागले. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. मुंबई महापालिका जर ४४ ते ५५ मजल्यांच्या इमारती बांधायला परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला देखील तितक्याच तयारीची गरज आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाकडे आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व तंत्र विकसित करणं आवश्यक आहे", असे कालिदास कोळंबकर म्हणाले आहेत.
मुंबईतील दादर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका रहिवाशी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर गुरूवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांना सुरक्षितरित्या अपार्टमेन्टमधून बाहेर काढून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.