संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू; हिंसाचार प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक
Sambhajinagar Violence : संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर आरोपींनी एकमेकांवर दगडफेक करत अनेक वाहनं जाळली होती.
Sambhajinagar Violence Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचार प्रकरणात आता महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. दोन्ही गटातील सहा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आता आणखी चार आरोपींना संभाजीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादानंतर किराडपुरा भागात दोन गटात जोरदार राडा झाला होता. त्यानंतर जमावानं १५ ते १७ गाड्यांना आग लावली होती. त्यात पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता.
राज्यपाल रमेश बैस यांनी संभाजीनगर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संभाजीनगर पोलिसांनी आठ पथकांची नेमणूक केली असून त्याद्वारे आरोपींना बेड्या ठोकण्यात येत आहे. हिंसाचाराच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी एकाचवेळी आठ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता आणखी चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आता संभाजीनगर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील आरोपींचं कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.
बुधवारी रात्री शहरातील किराडपुरा परिसरातील राम मंदिर परिसरात दोन गटात वाद झाला होता. त्याच वादातून दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांविरोधात दगडफेक केली होती. याशिवाय समाजकंटकांनी अनेक वाहनांना आग लावली होती. या हिंसाचारात १० पोलीस आणि १२ लोक जखमी झाले होते. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. याशिवाय हवेत गोळीबारही करण्यात आला होता.