Uddhav Thackeray : मुंबईत मराठी पाट्या लावा म्हटलं तरी लोक कोर्टात जातात आणि तिकडं बेळगावात...
Uddhav Thackeray on Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
Uddhav Thackeray Vidhan Parishad Speech : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर बोलताना विधान परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारला अक्षरश: धारेवर धरलं. ‘सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकार जी धमक दाखवतं आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी वक्तव्य करत आहे, ती धमक आपल्या सरकारमध्ये आहे का?,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी ठरावावरील चर्चेत सहभागी होताना उद्धव ठाकरे बोलत होते. सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे, असं त्यांनी सर्वप्रथम नमूद केलं. 'हा प्रश्न केवळ भाषावार प्रांतरचनेचा नसून माणुसकीचा आहे. हा वाद सुरू झाल्यापासून मराठी माणसांनी किंवा महाराष्ट्र सरकारनं इथल्या कन्नड भाषिकांवर कधीही अत्याचार केले नाहीत. कर्नाटकमधील मराठी भाषिकांनाच हा छळ सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती कोणाच्या बाजूनं बिघडली आहे हे लक्षात घ्यायला हवं. सर्वोच्च न्यायालयात हा वाद असताना कर्नाटकनं बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. नामांतर करण्यात आलं. मराठी भाषेची गळचेपी केली. कर्नाटक सरकार नियोजनबद्ध पद्धतीनं बेळगावावरील मराठीचा ठसा पुसत आहे. आम्ही मुंबईत नुसता मराठी पाट्यांचा कायदा केला तर लोक कोर्टात जातात. बेळगावात मराठी माणसं स्वेच्छेनं पाट्या लावल्या किंवा मराठी बोललं तरी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठं चाललो आहोत आपण? एका देशातील ही राज्य आहेत. हा तंटा सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे. केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? कर्नाटक सरकार ज्या ठामपणे भूमिका मांडतेय. एक इंचही देणार नाही अशी भाषा करतेय, ती धमक आपल्यात आहे का?,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.
'कर्नाटक सरकार या मुद्द्यावर पुढंच चाललं आहे. अरेरावीची भाषा करत आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी यावर ब्रही काढलेला नाही. कर्नाटकातील एक इंचही जागा आम्हाला नको. आमची जागा आम्हाला पाहिजे. हे आम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे. ठराव करायचाच असेल तर तो स्पष्ट असायला हवा. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असेपर्यंत बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा, असाच ठराव असला पाहिजे, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात केली.