'हे' संस्कार तुम्हाला संघानं दिलेत का?; सामनातून फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
Saamna Editorial Today : शिवसेनेतून बंड करण्यासाठी शिंदे गटानं खोके घेतल्याचं आमदार महेश शिंदे सांगत असताना त्याची एसआयटी चौकशी का केली जात नाही?, असा सवाल संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
Sanjay Raut On Devendra Fadnavis : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंची बाजू लढवण्यासाठी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं एक स्पेशल टीम नागपुरात पाठवली आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमध्ये नागपुरात राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
खासदार संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, नागपुरात तब्बल ११० कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरत आहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का?, असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. नागपुरातील भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फडणवीसांनी एसआयटी नेमली असती तर त्यांचं चरित्र आणखी उजळून निघालं असतं, असं म्हणत राऊतांची फडणवीसांवर चिमटा काढला आहे.
नागपुरच्या थंडीनं खोके सरकारचे मेंदू गोठून गेले- राऊत
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरमध्ये गेलेल्या बोक्यांच्या खोके सरकारचे मेंदू तेथील थंडीनं गारठून गेले आहे. अधिवेशनात चिखलफेक करून सरकारनं महापुरुषांच्या अपमानाचा विषय मागं ढकललला आहे. शिवरायांच्या अपमानावर इतर विषयांनी कुरघोडी करणाऱ्या सरकारच्या पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे?, असा सवाल करत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
आमदार खोके घेतल्याचं सांगत असतानाही त्याची चौकशी का नाही- राऊत
शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे स्वत: खोके घेतल्याचं कबूल करत आहेत. मग हा एसआयटी चौकशीचा विषय नाही का?, या प्रकरणाची एसआयची चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस का करत नाहीत?, शिंदे-फडणवीस सरकारकडून फक्त गाडलेले विषय उकरून त्याची चौकशी लावली जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. फडणवीसांनी ज्या होलसेलच्या दरात ज्यांना क्लीनचिट दिली त्या शंभर उंदरांचा फडशा पाडून काशीला पोहचलेल्या ४० बोक्यांचा आनंदही औटघटकेचा ठरेल, असंही भाकित संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून केलं आहे.