Mahanagar Palika Election : महापालिकेच्या निवडणुकांना दिवाळी नंतरचा मुहूर्त; नोव्हेंबरमध्ये सुरू होणार रणधुमाळी
Mahanagar Palika Election 2022 : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून यातूनच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्यात सर्व पक्ष गुंतले आहेत. दिवाळी नंतर महानगर पालिकेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने भाजप, शिवसेना, शिंदे गट, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस निवडणूक रणनीती आखतांना दिसत आहेत.
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर महानगर पालिकेच्या तयार झालेल्या प्रारूप याद्या रद्द करण्यात आल्या. त्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणूका या लांबल्या होत्या. मात्र, आता या निवडणूका येत्या दोन महिन्यात घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांना दिवाळी नंतरच्या मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुका बघता भाजप, मनसे, शिवसेना, राष्ट्रावादी आणि शिंदे गट, कॉँग्रेस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपच्या मदतीने शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारने निवडणूक संदर्भात घेतलेले अनेक निर्णय बदलले. आता पुन्हा या निवडणूका येत्या दोन महिन्यात घेतण्याच्या हालचाली सुरू आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद या महानगर पालिकांची निवडणूक ही रंगतदार ठरणार आहे.
आता पर्यन्त मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, शिंदे यांच्या बंडाळी नंतर आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच प्रहार केला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सत्तेची नवी समीकरणे होण्याची चिन्हे दिसत आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात डोळ्यांसमोर ठेवून शिंदे फडणवीस सरकारची तयारी सुरू आहे. गणपती उत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंत्री आपापल्या जिल्ह्यात दौरा करून जनमताचा सर्वे घेणार आहे. यावर निवडणूका या नोव्हेंबर महिन्यात घ्यायचे ठरवले जाणार आहे.
मनसेनेही या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला घेऊन नवी समीकरणे जुळवण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या