शेतकरी आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात आज ‘अन्नत्याग’ आंदोलन
गेली ३७ वर्ष राज्यातला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत आहे. सरकारे बदलली, पण शेतकऱ्यांचे दुःख कमी झालेले नाही. याचा निषेध म्हणून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी क्रूरपणे, विरोधीपक्ष बेजबाबदारपणे तर प्रसारमाध्यमे गाफीलपणे शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा करीत आहेत. याबद्दल किसानपुत्रांमध्ये रोष असून येत्या १९ मार्च रोजी महाराष्ट्रभर 'अन्नत्याग' उपवास केला जाणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे राज्याचे प्रमुख अमर हबीब यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर आजपर्यंत गेली ३७ वर्ष राज्यातला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत आहे. सरकारे बदलली, पण शेतकऱ्यांचे दुःख कमी झालेले नाही. सरकारी धाेरणे बदलणे नागरिकांच्या हातात नसले तरी शेतकऱ्यांबाबत सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस अन्नाचा त्याग करण्याचे आवाहन अमर हबीब यांनी प्रत्येक किसानपुत्राला केले आहे.
यंदाच्या 'अन्नत्याग' आंदोलनाच्या तयारीबाबत अमर हबीब म्हणाले, ‘पुण्यातील किसानपुत्र बालगंधर्व रंगमंदिराजवळ उपोषणाला बसणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी एसएम फौंडेशन येथे 'कोरडी शेती ओले डोळे' या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात येईल. मराठवाड्यात आंबाजोगाई येथे पत्रकार उपोषणाला बसणार आहेत. शहरातील विविध संघटना यासाठी सहकार्य करीत आहेत. जालना जिल्ह्यातील परतुर येथील नवनाथ तनपुरे हे गावोगावी भोंगा लावून १९ मार्च रोजी उपवास करण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती हबीब यांनी दिली. यावेळी राज्यात काही शहरांत शेतकरी आत्महत्याबाबत पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अकोला, वर्धा, नांदेड, वाशिम, सांगली, लातूर येथेही अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
हे उपोषण प्रत्येक किसानपुत्र आणि पुत्रीने करावे, असे आवाहन करत उपोषण हे सार्वजनिक ठिकाणी बसून करता येत नसल्यास प्रत्येकाने आपले नियमित काम करतानाही उपोषण करु शकताे, असे हबीब म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे सरकारने घोषित करावे, अशी मागणी करत आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. ते सरकारचे राष्ट्रीय दायित्व असल्याचेही हबीब म्हणाले.
संबंधित बातम्या