Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळेच आमची रणनीती शिंदे गटाला कळाली; शिवसेनेचा आरोप
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह रद्द केल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव गट यांना नव्या चिन्हासाठी अर्ज करायला लावले होते. या प्रक्रियेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. या संदर्भात १२ मुद्दे असलेले पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.
मुंबई : पक्ष चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे आमची रणनीती ही शिंदे गटाला कळाली असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर केला आहे. या संदर्भात तब्बल १२ मुद्यांचे पत्र उद्धव गटाने निवडणूक आयोगाला लिहिले आहे. पक्ष चिन्ह आणि नावाचा वाटपंत पक्षपातीपणा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
धनुष्यबाण या चिन्हावर उद्धव गट आणि शिंदे गट या दोघांनी दावा केला होता. हा वादावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय देण्यास सांगितले होते. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून दोन्ही गटाला नव्या चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावसाठी पर्याय देण्यास सुचवले होते. दोन्ही गटांनी हे पर्याय दिले होते. त्यानुसार उद्धव गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले तर शिंदे गटाला बाळसाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. तसेच उद्धव गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले. मात्र, हे करतांना निवडणूक आयोगाने पक्षपात केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना त्यांनी घेतलेली भूमिका ही चुकीची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाने जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केली असा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. यामुळे त्यांची रणनीती ही थेट शिंदे गटाला कळली असे ठाकरे गटाचे म्हणने आहे. तब्बल १२ मुद्दे असलेले हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या आरोपवर निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे आता लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या
विभाग