Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज, आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather Update : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात घट होत असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या हंगामातील मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. येत्या आठवड्याभरात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वीच आता विदर्भ तसेच मराठवाड्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता खरीप हंगामासाठी मशागतीच्या तयारीला लागलेल्या बळीराजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर गेले दोन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळं नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
केरळमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळं राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता हवामान खात्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर ही तीन जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील सिंधुदूर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, लातूर तसेच नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यामुळं आता अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळं शहरी भागांतील नागरिकांना दिलासा तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दणका बसण्याची शक्यता आहे.