मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : आरक्षणासाठी २४ तासांत चौघांची आत्महत्या; मराठा आंदोलन आणखी तीव्र होणार?

Maratha Reservation : आरक्षणासाठी २४ तासांत चौघांची आत्महत्या; मराठा आंदोलन आणखी तीव्र होणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 05, 2023 04:39 PM IST

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे. परंतु अद्यापही राज्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे.

Maratha Reservation Protest Marathwada
Maratha Reservation Protest Marathwada (HT_PRINT)

Maratha Reservation Protest Marathwada : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन तूर्तास मागे घेतलेलं आहे. सरकारला आरक्षणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. परंतु आता आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील चार तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील चार तरुणांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता मराठा आरक्षणासाठी सुरू झालेलं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घेतलेलं असलं तरी मराठवाड्यात तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. बीड जिल्ह्यातील अमोल रोहिदास नांदे, प्रेमराज किशोर जमदाडे, नांदेडमधील तुकाराम मोरे आणि संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील कृष्णा जगताप या तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस सरकारने शिंदे समितीची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील निजामकालीन दस्तावेज समितीकडून शोधले जाणार आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला अधिक वेळ हवा असून तो मनोज जरांगे पाटलांनी द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. दिलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्यास थेट मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

IPL_Entry_Point