मोठी बातमी.. १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, ४८ तासांची मुदत
महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या१६बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतलाआहे.अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतरबंडखोर आमदारांना४८तासांत आपले म्हणणे मांडावे लागेल.
मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर बंडखोर आमदारांना ४८ तासांत आपले म्हणणे मांडावे लागेल. त्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची व त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधान भवनात आज दुपारपासून हालचाली सुरु होत्या. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज दुपारी पाच वाजता विधान भवनात दाखल झाले होते. तेव्हापासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या विषयावर मंथन सुरु होतं. या दरम्यान महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे देखील विधान भवनावर दाखल झाले. झिरवळ आणि महाधिवक्ता यांच्यात सलग एक तासाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव सादर करण्याचा दावा दोन दिवसांपूर्वी केला होता. याच अविश्वासाच्या ठरावाचा धागा पकडत नरहरी झिरवळ आपल्याला अपात्र ठरवू शकत नाहीत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला होता. पण त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला होता. व सर्व कायदेशीर बाबी तपासून १६ बंडखोरांना अपात्र ठरविण्याबाबत नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला.