Maharashtra Budget : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळालं?, वाचा सविस्तर!
Maharashtra Budget : आगामी मनपाची निवडणूक विचारात घेऊन शिंदे-फडणवीस सरकारनं अर्थसंकल्पात मुंबईसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
Maharashtra Budget Live Updates : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून यंदाचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बजेटचं वाचन केलं असून त्यात त्यांनी शेतकरी आणि महिलांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय ग्रामीण भागांसह शहरांचा विकास करण्यासाठी देखील बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार असल्यामुळं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं आहे.
मुंबईसह उपनगरातील पायाभूत सुविधांसाठी आणि मेट्रोच्या विस्तारासाठी सरकारकडून भरीव निधी देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चालू आर्थिक वर्षात मुंबईत ५० किलोमीटर लांबीचा नवा मेट्रोमार्ग तयार केला जाणार असून त्यातून वाहतूकीचा प्रश्न सोडवला जाईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मेट्रो १० आणि मेट्रो ११ या प्रकल्पांची काम सुरू करण्यात येणार असल्याचं यंदाच्या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रोचा आराखडाही अंतिम टप्प्यात आला असल्याचं अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईच्या सुशोभिकरणाच्या अर्थसंकल्पात तब्बल १७२९ कोटी रुपयांची तरतूद करण्या आली आहे. एमएमआर क्षेत्रातील शिळफाटा येथील हिल्स बोगदा, पारबंदर प्रकल्प आणि मीरा-भाईंदर येथील पाणीपुरवठा प्रोजेक्ट चालू वर्षातच पूर्ण केला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे. वसई आणि ठाणे दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी ४२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण आणि मुरबाड दरम्यान रेल्वे प्रकल्पाचंही काम हाती घेतलं जाणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.