नवाब मलिक यांचे कारनामे उद्धव ठाकरेंना माहीत होते, पण…; सोमय्यांचा गंभीर आरोप
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवल्यानंतर विरोधी पक्ष भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे. ‘नवाब मलिक हे दाऊदचे एजंट आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांचे सर्व कारनामे माहीत होते, पण मुख्यमंत्रिपदासाठी ते गप्प आहेत,’ असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या दाऊदशी असलेल्या संबंधांबद्दल उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे अनेकदा बोलले होते. आता मुख्यमंत्रिपदासाठी उद्धवजीही दाऊदचे मित्र झालेत का, असा प्रश्न सोमय्या यांनी केला. 'मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी धर्म, संस्कृती व वडिलांचे विचार पणाला लावले, अशी टीकाही त्यांनी केली.
नवाब मलिक यांच्यावर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा महाविकास आघाडीचा दावा आहे. त्यामुळंच अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावरूनही सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. 'माझ्या एजंटला मंत्रिपदावरून काढलं तर तुमचं मुख्यमंत्रिपद जाईल अशी धमकी दाऊदनं त्यांना दिली असेल. म्हणूनच ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नसतील, असंही सोमय्या म्हणाले.
नवाब मलिक हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत. त्यांचे जामीन मिळवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आता तर खुद्द न्यायालयानंच त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विभाग