मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: लहान मुलांना वेठबिगारीस भाग पाडलं जातंय, हे मन विषण्ण करणारं : राज ठाकरे

Raj Thackeray: लहान मुलांना वेठबिगारीस भाग पाडलं जातंय, हे मन विषण्ण करणारं : राज ठाकरे

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 23, 2022 11:29 AM IST

Raj Thackeray: गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत अशी इच्छाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुलांच्या वेठबिगारीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला सुनावलं आहे. तसंच प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आहे. त्यात म्हटलं की, "गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत."

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही असंही त्यांनी म्हटलं.

लहान मुलांच्या वेठबिगारीचा मुद्दा गंभीर असल्याचं म्हणताना त्यांनी राज्य सरकारकडे विनंतीसुद्धा केली आहे. राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज्य सरकार, प्रशासनाकडून लहान मुलांची वेठबिगारी बंद करण्यासाठी पावले उचलली जात असताना समाजानेसुद्धा पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग