CM शिंदेच्या मर्जीतील बांगर यांच्या हाती ठाणे मनपाची सूत्रे, राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील ४४ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बदल्यांचा निर्णय घेतला गेला.
राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी ते महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाण्यातील महापालिका आय़ुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी आता अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी अशी अभिजीत बांगर यांची ओळख आहे.
मुंबई महापालिकेच्या आय़ुक्तपदी संजय नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्याही आहेत. अभिजीत बांगर यांच्याकडे ठाण्याच्या आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वल्सा नायर-सिंह यांची गृहनिर्माण, मनीषा म्हैसकर (मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाबरोबरच मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभार), प्रदीप व्यास (आदिवासी विकास), प्रवीण दराडे (पर्यावरण), हर्षदिप कांबळे (उद्योग), मिलिंद म्हैसकर (उत्पादन शुल्क व नागरी उड्डयण), संजय खंदारे (आरोग्य), अश्विनी जोशी (वैद्यकीय शिक्षण), सौरभ विजय (पर्यटन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी अशोक शिनगारे यांची बदली झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवसाथापकीय संचालकपदी विपीन शर्मा , महानिर्मिती कंपनीची व्यवस्थापकीय संचालकपदावर पी अनबलगन यांची नियुक्ती केली आहे.