मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अंकुश आणि अमृताची लव्हस्टोरी दिसणार 'ऑटोग्राफ'मध्ये, नव्या चित्रपटाची घोषणा

अंकुश आणि अमृताची लव्हस्टोरी दिसणार 'ऑटोग्राफ'मध्ये, नव्या चित्रपटाची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 18, 2022 03:59 PM IST

Autograph Movie: सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, मानसी मोघे यांच्या प्रमुख भूमिका असलेली एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी ' ऑटोग्राफ ' होणार डिसेंबरमध्ये प्रदर्शित

ऑटोग्राफ
ऑटोग्राफ (HT)

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शत सतीश राजवाडे एक नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ऑटोग्राफ असे आहे. या चित्रपटात एक भन्नाट लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, मानसी मोघे या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची एकंदरीत स्टारकास्ट पाहाता सर्वांना चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

'ऑटोग्राफ' ही कथा आहे प्रेम आणि प्रेमभंगाची व वर्षानुवर्षे जपलेल्या त्यांच्या आठवणींची. ही कथा आहे एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची. एका अनोख्या अशा दृष्टिकोनाची ही प्रेमकथा 'ऑटोग्राफ' ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिभावान कलाकार काम करत असून चित्रपट अगदी ताज्यातवान्या संकल्पनेवर बेतला आहे. ही कथा आपल्या कायमची लक्षात राहील अशीच आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या वतीने संजय छाब्रिया यांनी 'ऑटोग्राफ'च्या वर्षअखेरीस होणाऱ्या प्रदर्शनाची घोषणा सोमवारी केली. या चित्रपटात पडद्यावर आणि पडद्यामागे जी मोठमोठी नावे जोडली गेली आहेत, त्यामुळे या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत एकच चर्चा आहे.

सतीश राजवाडे हे आज एक घराघरात पोहोचलेले नाव आहे. केवळ एक प्रथितयश दिग्दर्शकच नव्हे तर एक चांगला लेखक आणि अभिनेता म्हणूनही ते मराठी व हिंदी चित्रपसृष्टीत ओळखले जातात. अनेक लोकप्रिय आणि पुरस्कारविजेते चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. मुंबई-पुणे-मुंबई ही तीन चित्रपटांची मालिका, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करतेय, आपला माणूस आणि इतरही अनेक चित्रपटांचा त्यात समवेश आहे.

'ऑटोग्राफ'बद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, "या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना जवळ आणण्याची आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या व्यक्तींची आठवण करून देण्याची ताकद आहे. एखाद्या 'ऑटोग्राफ'प्रमाणे ज्या माणसांनी आपल्या आयुष्याला आकार दिला आहे आणि आपल्या आयुष्यावर आपला ठसा उमटवला आहे, अशांची आठवण ही कथा करून देते. या कथेत सुख-आनंद देणारे क्षण असतील, तसेच अपरिहार्यपणे चटका लावणारेही प्रसंग असतील. पण सरतेशेवटी अंतिम अनुभव हा हृदयाला भिडणारा असेल. ही कथा आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या हृदयात आयुष्यभर जपून ठेवेल अशीच आहे."

IPL_Entry_Point

विभाग