छोट्या पडद्यावरची ‘ही’ लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण!
Mazhi Tuzhi Reshimgath: अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेतील शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘शेवटचे काही दिवस’ असे लिहिले आहे.
Mazhi Tuzhi Reshimgath: छोट्या पडद्यावरच्या ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. तर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, असे म्हटले जात आहे. याला कारणीभूत ठरलीये प्रार्थना बेहेरेची सोशल मीडिया पोस्ट...
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रार्थना बेहेरे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेतील शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘शेवटचे काही दिवस’ असे लिहिले आहे. यात ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील ‘नेहा’च्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिची पोस्ट पाहून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
या मालिकेतील नेहा, यश, परी या मुख्य पात्रांसह सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत ‘परी’च्या भूमिकेत झळकलेली बालकलाकार मायरा वायकूळने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतून चिमुकल्या परीने घराघरांत प्रसिद्धी मिळवली. मात्र, आता ही मालिका संपणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण पसरलं आहे. आम्ही चौधरी कुटुंबाला खूप मिस करू, असे चाहते म्हणत आहेत. तर, काहींनी परीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
सध्या या मालिकेत यश आणि परी नेहाची स्मृती परत येण्याची वाट बघत आहे. एका अपघातात नेहा देवाघरी गेली असे सगळ्यांनाच वाटले होते. मात्र, अचानक ती पुन्हा सगळ्यांसमोर आली. पण, यावेळी ती नेहा म्हणून नाही तर, अनुष्का बनून आली आहे. अनुष्काला तिचा भूतकाळ आठवत नाही. अनुष्काचे वडील मेहता इंडस्ट्रीचे मालक आहेत. परंतु, त्यांनी देखील अनुष्काच नेहा असल्याचे सत्य लपवले आहे. आता अनुष्का देखील यशच्या प्रेमात पडली आहे. लवकरच तिची स्मृती परत येऊन तिला आपणच नेहा असल्याचे आठवणार आहे.